पुणे : “आजच्या युवा पिढीला ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे. गायकांनी भूतकाळात न जगता, बदल मान्य केले पाहिजेत. आज ‘कराओके’ च्या युगात गायकांना वाद्यवृंदासह गायनाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे ‘सोमेश्वर फाऊंडेशन’चे काम कौतुकास्पद आहे. या संधीचा फायदा महाराष्ट्रातील नवोदित गायकांनी घ्यावा. गायक, कलावंतांनी कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे,” असे मत ज्येष्ठ गायक पं. अजय पोहोणकर यांनी व्यक्त केले.
‘सोमेश्वर फाऊंडेशन’च्या आयोजित कार्यसम्राट आ. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे ‘पुणे आयडॉल स्पर्धा.’ या स्पर्धेचे उद्घाटन आज पं. भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे पं. अजय पोहणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सावनी रविंद्र, ‘सोमेश्वर फाऊंडेशन’चे अध्यक्ष, माजी नगरसेवक सनी निम्हण, स्वाती निम्हण, नंदकुमार वाळुंज, बिपिन मोदी, ज्ञानेश्वर मुरकुटे आदि मान्यवर उपस्थित होते. सावनी रवींद्र म्हणाल्या, “एखादी
गोष्ट सुरू करणे सोपे असते, मात्र त्यामध्ये सातत्य टिकवणे अत्यंत अवघड काम असते. ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ने ते काम करून दाखवले आहे. लहानपणापासून या व्यासपीठावर येण्याची इच्छा होती. आज इथे येता आले, हे मी माझे भाग्य समजते.” प्रास्ताविकपर भाषण सनी निम्हण यांनी केले.
‘पुणे आयडॉल स्पर्धा’ चार गटांत होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, दि. २४ मे दु. १२ ते ३ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. बक्षीस समारंभ कार्यक्रमानंतर जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘गीतों का सफर’ या सांगीतिक कार्यक्रमाने स्पर्धेची सांगता होणार आहे. अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे परीक्षण गायक जितेंद्र भुरुक आणि मुग्धा वैशंपायन करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि महेश गायकवाड यांनी केले, तर उमेश वाघ यांनी आभार मानले.
‘गायक, कलावंतांनी कालानुरूप होणारे बदल स्वीकारावे’
